Friday, May 9, 2014

किल्ले माहुली


भौगालिकदृष्ट्या  शहापूरच्या वायव्येला असलेला हा किल्ला मध्ययुगीन कालखंडात भोवतालच्या महत्वाच्या ठिकाणाशी जोडलेला गेला होता. कल्याण सुभ्याजवळ किल्ला म्हणून शिवकाळात त्याला विशेष महत्व होते. तसेच नाशिक व सुरत परिसराशी सुद्धा माहुलीचा संबंध होता. माहुली वरून जव्हार मार्गे सुरत तर माहुली वरून नाशिक आणि माहुली वरून किन्हवली-मुरबाड मार्गे नाणेघाट ओलांडून जुन्नर तसेच अहमदनगर अश्या भौगोलिक रचनेमुळे माहुलीला अधिक महत्व प्राप्त झाले होते. ठाणे, कल्याण, भिवंडी, जव्हार, नाशिक, सुरत, मुरबाड अश्या महत्वाच्या ठिकाणांना माहुली किल्ला जोडलेला असल्याने त्याला महत्व प्राप्त झाले होते.

सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये येणारा आणि अग्निजन्य खडका पासून बनलेला हा किल्ला एक दुर्गत्रिकुट आहे. माहुली, भंडारगड, आणि पळसगड मिळून हा किल्ला तयार झाला आहे.त्यामुळे ह्या किल्ल्याची रचना तीन वेगवेगळ्या भागांनी बनलेली आहे. मध्यभागी माहुली, उत्तरेस पळसगड आणि दक्षिनेस भंडारगड अश्या दुर्गत्रिकुटाचा एक दुर्ग बनलेला असून त्यातील माहुली हा मोठा किल्ला आहे.


किल्ल्याचे वर्णन आणि पोहोचण्याबाबत माहिती.
माहुलीगाव ते किल्लाच्या पायथा या १० मिनिटांच्या रस्त्यात आपल्याला एकूण ४ मंदिरे लागतात. हि मंदिरे सुद्धा ऐतिहासिक आहेत. प्रथम मारुतीचे मंदिर लागते. या मंदिरात असणारी मारुतीची मूर्ती जुनी आहे. विहिरीच्या समोर एक शिवमंदिर असून त्याला माहुलेश्वेर असे म्हणतात. १९८२-८३ मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. मंदिराच्या प्रवेशद्वारा लगतच नांदी असून नंदी ज्या पायावर तो पाय पाहता त्याचे प्राचीनत्व लक्षात येते. नंदिसमोर शिवलिंग असून इतर शंकराच्या मंदिरा प्रमाणेच हे शिवलिंग सुद्धा जमिनीच्या समान पातळीवर नसून काहीसे खाली आहे. गाभारयातील शिवलिंगाच्या मागे एका कोनाड्यात मत पार्वतीचे शिल्प आहे. या माहुली मंदिरात माहुलीचा संक्षिप्त इतिहास व माहुलीची रचना दुर्गप्रेमी मंडळाने चित्रित केली आहे. मंदिराकडे तोंड करून उभे राहिल्यावर मंदिराच्या बाजूने उजव्या हाताला एक रस्ता जातो. तो माहुली किल्ल्यावर उगम पावणाऱ्या भारंगी नदीकडे जातो. पावसाळ्या व्यतिरिक्त या नदीत फारसे पाणी नसते. मंदिराच्या डावीकडे देवीचे मंदिर असून त्यातील देवीची मूर्ती शिवकालीन असल्याचे सांगितले जाते. यातील मुख्य मूर्ती हि वज्रेश्वरीच्या मूर्तीसारखी आहे असे पुजारी सांगतात. या दोनही मंदिराच्या आसपास काही प्राचीन शिल्प सुद्धा विखुरलेली आहेत. देवीच्या मंदिरामागे एका पिंपळ वृक्षाखाली गाडी चौथऱ्यावर शिवलिंग व गणेश मूर्ती आहे. माहुलेश्वर मंदिराच्या मागून एक पायवाट जाते.या पायवाटेने पुढे गेल्यास दोन ते तीन मिनिटाच्या अंतरावर गणेश मंदिर असून त्याचा जीर्णीधार १९७८-७९ ला झाला आहे. 


मंदिराच्या समोर एक दगडी घुमट, दगडी अर्धवट फुटलेला पाटा, युद्धप्रसंगांचे चित्रण असलेले अर्धवट फुटलेले विरगळ आहे. या चारही मंदिरातील मूर्ती किती जुन्या आहेत हे सांगता येणे तसे अशक्य आहे. पण त्य शिवकालीन वा पेशवेकालीन म्हणजेच मध्ययुगीन तर नक्कीच आहेत. पेशावेकाळात यातील काही मंदिरांची स्थापना झाली असे मानले जाते. किल्ल्याचा इतिहास आणि पायथ्याचा परिसर एकदा लक्षत आल्यानंतर प्रत्यक्षात किल्ला चढणे व किल्ल्याची पाहणी करणे सोपे जाते. मुळात हा एकाच किल्ला नसून दुर्गत्रिकुट आहे. मध्यभागी माहुली उजवीकडे पळसगड आणि डावीकडे  म्हणजे काहीसा पश्चिमेकडे भंडारगड असे हे त्रिकुट असल्याने एका दिवसात हे तीनही पाहता येणे शक्य आहे. गडावर जाण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत. किल्लाचा महादरवाजा हा मूळ मनाला जातो. एका नाळेच्या तोंडाशी कातळ खोदून पायरया खोदलेल्या असून पहारेकारांच्या देवड्या कोरलेल्या आहेत. या देवड्याच्या पुढे बुरुज उभारले आहेत.  वास्तविक हि किल्ल्यावर जायची मूळ वाट आहे. पण ह्या वाटेवर केवड्याचे वन वाढलेलं आहे. त्यामुळे ह्या मुख वाटेवर दुर्लक्ष झालेले आहे. ह्या महादरवाजा बरोबरच भंडारगडावरून कल्याण दारावाजाद्वारे किल्ल्यावर जाता येते. पण हा मार्ग खूपच अवघड असल्याचे स्थानिक सांगतात. त्यामुळे जाण्यासाठी गणेश मंदिराच्या समोरून गेलेली पायवाट हाच एक योग्य मार्ग आहे. सध्या ह्या पायवाटेने किल्ल्याकडे जाता येते, 

या पायवाटेने जाताना वाटेत एक डोंगराचा सुळका वा डोंगराची कडा लागते. तिचा आकार घोड्याच्या मानेसारखा असल्याने त्याला घोड्याची मान असे म्हणतात तेथून पुढे वर आल्यानंतर वाट साधी आणि एकदम उभी चढणीची होते. येथे आपण माहुलीच्या कड्याला येतो. कडा चढून जाण्यासाठी सुमारे ८-९ फुट उंचीची एक लोखंडी शिडी आहे. पूर्वी हि शिडी मोकळी होती. आता मात्र ती मजबूत केली आहे. संपूर्ण किल्ला चढताना हे एकाच ठिकाण अवघड आहे. ते मात्र जपून जावे लागते. शिडी चढून वर आल्यानंतर जवळ जवळ किल्ल्यात मागील बाजूने प्रवेश होतो. हा पायवाटेचा  मार्ग मुळच्या महादरवाज्याच्या वाटेपासून किमान पाचशे फुटापेक्षाहि दूर आहे. किल्ल्यात प्रवेश केल्यानंतर डावीकडे झाडा झुडूपात न जाता उजवीकडे जी पायवाट आहे, तेथून महादरवाजाकडे जाता येते. तेथे एक पाण्याचे टाके व देवड्या म्हणजे पहारेकरयाची जागा आहे. दुसरे एक पाण्याचे टाके शिडी चढून वर आल्यानंतर लगेच दिसून येते. पायथ्याशी शिवमंदिरासमोर विहीर आणि दोन टाकी या व्यतिरिक्त पाण्याची सोय अन्यत्र नाही. महादरवाज्या वरून उजवीकडे न जाता सरळ वरच्या अंगाकडे गेल्यानंतर एक भिंत आणि कलाकुसरीची काही शिल्प आढळतात. तेथे उर्दू लिपीतील शिलालेख असून त्याचा अर्थ स्पष्ट झालेला नाही. या जागेला नमाजगिर असे म्हणतात. नमाजगिराच्या उजवीकडे गेल्यानंतर एका वाड्याचे अवशेष आढळतात. एकेकाळी चिरेबंदी असणाऱ्या वाड्याचे आज भग्नावशेष शिल्लक आहेत. किल्ल्यावरच्या पठाराच्या मध्यभागी एक तळे असून  त्याला माहुलेश्वराचे तळे असे म्हणतात. पळसगडावरून तानासातलावाचे विहिंगमय दृश्य दिसते. पळसगडावर जाणारी वाट बांबूच्या बनातून जाते. पळसगड का म्हंटले जाते हे सांगता येत नाही. मात्र कदाचित येथे पूर्वी पळसाची झाडे विपुल प्रमाणात असल्याची शक्यता नाकारता येत नाही. यालाच गिर्यारोहक छोटा माहुली असेही म्हणतात 

Friday, July 24, 2009

शहापूरची संक्षिप्त ओळख

ठाणे जिल्हयातील भिवंडी उपविभागात सामाविष्ट करण्यात आलेला शहापूर तालुका क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा तालुका आहे. एकूण क्षेत्रफळ १,५४,२७० हेक्टर म्हणजे १९३९ चौ.कि.मी. आहे. सह्याद्रीच्या पर्वत रांगीतील डोंगरांनी वेढलेल्या शहापूर तालुक्याच्या उत्तरेस नाशिक जिल्हा आहे. दक्षिणेस मुरबाड, कल्याण, भिवंडी हे तालुके तर पश्चिमेस वाडा तालुका आहे. आदिवासींची संख्या जास्त असल्याने आदिवासी तालुका म्हणून ओळखला जातो. ठाकूर, वारली, कोकणा, कातकरी, काथोडी, महादेव कोळी, या, आदिवासी जमाती शहापूर तालूक्यातील आदिवासी जमातीपैकी आहेत. एकूण लोकसंख्येत कुणबी व आगरी समाजाची लोकसंख्या जास्त आहे. मुंबई-आग्रा हा राष्ट्रीय महामार्ग क्र ३ शहापूर तालुक्यातून  जात असून संपूर्ण तालुक्यातील त्याची लांबी, ६५ कि. मी. आहे. मुंबई-आग्रा महामार्ग होण्यापूर्वी मुरबाड मार्गे माळशेज-नाणे घाटातून अन्य भागांशी पूर्वीपासून संपर्क होता. तत्पूर्वी ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात, १८४० मध्ये मुंबई-भिवंडी-नाशिक रस्ता सुरु झाला. कल्याण कसारा रेल्वे मार्गाचे काम १८५४ नंतर सुरु झाले.

१ ऑक्टोंबर १८५५ पर्यंत कल्याण वासिंद रेल्वे मार्गाचे काम पूर्ण झाले. मुंबई ते वासिंद या पहिल्या रेल्वेची जाहिरात The Bombay Times मध्ये दिवाळीत देण्यात येवून वासिंद कडे गाडी सोडण्यात येणार असल्याची बातमी देण्यात आली. ७ नोव्हेंबर १८५५ रोजी दुपारी १ वाजता बोरीबंदरहून (सीएसटी ) गाडी सुटणार आणि ३.३० वाजता वासिंडला पोहचून ती पुन्हा संध्याकाळी ६.१५ वाजता मुंबईला जाण्यास निघणार होती. मे १८५४ ते नोव्हेंबर १८५५ या कालावधीत कल्याण-वासिंद रेल्वे मार्ग पूर्ण होवून आदिवासी-जंगलपट्टीचा प्रदेश असणारया शहापूर तालुक्यात रेल्वे आली त्याला १५० वर्ष पूर्ण झाली आहेत. शहापूर तालुक्यातील विहीगाव-ईहेगावचा पूल हा त्यावेळचा चमत्कार मानला जात होता. 


शहापूर तालुक्यातील वासिंद हे सर्वात जुने स्थानक आहे. १९२९-३० च्या सुमारास विजेवर चालणाऱ्या गाड्या सुरु झाल्या थळघाट सुरु होण्यापूर्वी तसेच उपनगरीय रेल्वे मार्गाचे शेवटचे स्थानक असलेला कसारा, शहापूर तालुक्यात असून वासिंद, आसनगाव, आटगाव, खर्डी व कसारा हि रेल्वे स्थानके शहापूर तालुक्यात येतात. ब्रिटीश कालीन ग्रेट इंडियन पेनेन्सुला रेल्वे (GIP) म्हणजे सध्याच्या मध्य रेल्वेवर असणाऱ्या आसनगाव स्थानकाचे सध्याचे आसनगाव  हे नाव अलीकडील असून त्याचे पूर्वीचे नाव शहापूर होते. आसनगाव स्थानकापासून शहापूर गाव २ कि.मी. अंतरावर आहे. ब्रिटीश काळात बांधलेले रेल्वे गुदाम, बुकिंग ऑफीस आजही कायम आहेत. रेल्वे व रस्ता वाहतुकींच्या सोयीमुळे शहापूरच्या विकासाला चालना मिळाली आहे. 


शहापूर नावाच्या उत्पातीविषयी निष्कर्ष लावणे अशक्य आहे. काही जेष्ठ नागरिकांच्या मते शहापूरचे मूळ नाव सिंहपूर आहे. सिंहपूरचा अपभ्रंश शहापूर झाले असल्याचे म्हंटले आहे. मुळात शहापूर हे गाव नंतर वसले असावे. कारण कल्याण नाशिक रस्ता माहुली किन्हई खिंड तानसा असा होता. ब्रीटिशकालात तानसा धरणाचे काम सुरु झाल्यानंतर हा रस्ता बंद झाला. तसेच जंगली श्वापद व चोऱ्या ह्यामुळे तेथील वस्ती उठून शहापूर गाव वसत गेले. बहुतांशी वस्ती माहुली परिसरात असल्याची माहिती मिळते. शिवकालीन व पेशवेकालीन कागदपत्रांमध्ये प्रामुख्याने माहुलीचा उल्लेख येतो. शिवकाव्यात माहुलीचा उल्लेख मलयाचल असा करण्यात आला आहे. पेशवाईच्या अस्तानंतर माहुली येथील वस्ती उठत गेली आणि शहापूर गाव वसत गेले. नावात शेवटी असलेला पूर शब्द लक्षात घेता परिसरावर हिंदू राज्यसत्तेचा प्रभाव नाकारता येत नाही. माहुली  किल्ला व पुणधे येथील मंदिरावरून हा भाग शिलाहारांच्या प्रभावाखाली असावा. पुढे मध्ययुगात निजामशाही व आदिलशाहीने आपला प्रभाव निर्माण केला. शहाजीराजे आणि सुद्धा आपले वर्चस्व माहुली किल्ला व परिसरावर निर्माण केले. त्यामुळे शहाजी राजांच्या प्रभावामुळे शहापूर नाव पडले कि पातशह्यांच्या प्रभावामुळे शहापूर नाव मिळाले कि सिंहपूरचा अपभ्रंश होवून शहापूर नाव निर्माण झाले याबाबत कोणताही कोणताही ठाम निष्कर्ष काढणे अशक्य आहे. पूर्वीचे सिंहपूर मुघलकाळात शहापूर झाले असावे. 


शहापूर नावाचे दुसरे एक वैशिठ्य म्हणजे आज शहापूर म्हणून ओळखला जाणारा तालुका पूर्वी म्हणजे सुमारे दीड शतकापूर्वी  "कोळवण" तालुका म्हणून ओळखला जायचा. १८६०-६३ मधील "मिलिटरी डीपार्टमेंट  डायरी" क्र. ९५७ मधील पृष्ठ ३२५ वर माहुली किल्ल्याचे वर्णन असून हा किल्ला कोळवण तालुक्यात असल्याचा उल्लेख आहे. यावरून शहापूर तालुका पूर्वी कोळवण तालुका म्हणून ओळखला जायचा. ई.स . १८८० च्या सुमारास ब्रीटिशानी कोळवण चे रुपांतर शहापूरमध्ये केले व मोरवाडा पेठा प्रशासनाच्या सोयीसाठी शहापूर पासून वेगळा केला. सिंहपूर, माहुली कोळवण, अशी नावे शहापूरला होती असे लक्षात येते. 


शहपुरचे हवामान साधारणपणे उष्ण व दमट आहे. भरपूर पाउस व सदाहरित जंगले यासाठी तालुक्याला प्रसिद्धी मिळाली. ठाणे जिल्ह्यातील तानसा अभयारण्य याच तालुक्यात आहे. १९४१ मध्ये शहापूर येथे वनप्रशीक्षण विद्यालय स्थापन करण्यात आले. भरपूर पावसामुळे अर्थातच शेती हे उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे. शेती उत्पादन  जास्त असून "भाताचे कोठार"  म्हणून शहापूर तालुका ओळखला जाई. ब्रिटीश काळात एक उत्तम बाजारपेठ म्हणून शहापूर प्रसिद्ध होते. औद्योगिक विकास मात्र होवू  नाही. नो केमिकल झोन मुळे  औद्योगिक विकासाला मर्यादा आहेत. 


तानसा, वैतरणा, भातसा नद्या हा या तालुक्यातील मुख्य जलस्रोत आहे. तानसानदी तालुक्यातील घाटमाथ्यावर उगम पावते. भातसानदिचा उगमही घाटमाथ्यावर असून हि नदी  येथे उल्हास नदीस मिळते. वैतरणा नदीचा उगम त्र्यंबकेश्वर येथे झाला असून शहापूर तालुक्यात वाहते व नवघर येथे अरबी समुद्रास  मिळते. भारंगी नदीचा उगम माहुली पर्वतावर असून पुढे ती भातसा नदीस मिळते. नद्यांची उपलब्धता आणि पर्जन्यमान यामुळे मुंबईला पाणी पुरवठा करण्यासाठी ब्रिटीशकाळात धरणे बांधण्याची कल्पना पुढे आली. आणि स्वातंत्रपूर्व काळात प्रथम तानसा आणि वैतरणा (मोडकसागर ) हि धरणे बांधण्यात आली. तर भातसा धारण १९६५ मध्ये बांधण्यात आले. तानसा, वैतरणा, भातसा हि मोठी धरणे तर जांभे, मुसई, डोळखांब, आदिवली, वेहळोली व खराडे, हे लघुपाटबंधारे प्रकल्प शहापूरमध्ये आहेत. याशिवाय जपानच्या मदतीने उभा असलेला चोंढे जलविद्युतप्रकल्प तालुक्यातील डोळखांब येथे आहे.